Saturday, March 2, 2019

बाबू हरिदास आवळे :तक्षक लोखंडे नागपूर

धम्मरक्षक बाबू हरिदास आवळे यांचे आंबेडकरवादी चळवळीतील योगदान-
१) छत्तिसगढ येथील सतनामी समाजात संत घासिराम यांची जयंती साजरी करुन सतनामी समाजाला संघटीत केले व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, करुणा या जीवनमुल्यांवर आधारित समाज व्यवस्थेसाठी लढण्यास तयार केले.
२)१४ ऑक्टोबर १९५६ ला झालेल्या धर्मांतराच्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून सशस्त्र सैनिकांची फौज तयार ठेवली. गुप्त माहिती काढण्यासाठी समता सैनिकांची नियुक्ती केली व धर्मांतराचा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यास मदत केली.
३) ज्या पवित्र दिक्षाबूमीवर बाबासाहेबांनी बुध्द धम्माची दिक्षा दिली ती दिक्षाभूमी बौध्द धम्माच्या धार्मिक कार्यासाठी मिळावी, या हेतुने दर पोर्णिमेला बुध्द आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाचे वाचन सुरु केले.
४)१३ एप्रिल १९५६ ला रात्री तथागत भगवान बुध्दांची मुर्ती पवित्र दिक्षाभूमीवर बसवली.
५) विधान परिषदेचे सदस्य असताना आवळे बाबूंनी विधान परिषदेत अशासकिय ठराव आणून दिक्षाभूमी बौध्दांच्या धार्मिक कार्यासाठी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चार एकर जागा देण्याचे विधान परिषदेत जाहिर केले. विधान परिषदेत सदस्य असलेले गोगटे यांनी प्रश्न केला की ही भूमी कुणाच्या नावे देण्यात येत आहे? त्यावर आवळेबाबूंनी सांगीतले की ही भूमी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौध्द महासभेचे विध्यमान अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर यांच्या संस्थेच्या नावाने द्यावी.
६) आवळे बाबूंनी भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिक्षाभूमीवर बसवून बाबासाहेबांचा पुतळा स्मारक समितीला एन.शीवराज यांचे उपस्थीतीत दादासाहेब गायकवाड यांना दान दिला.
७) बाबासाहेबांचा दिक्षाभूमीवरील सोहळा हा धम्मदिक्षेचा सोहळा नसून ती राजकिय सभा होती... असा युक्तीवाद तत्कालिन न्यायाधिश भवानीशंकर नियोगी यांनी न्यायालयात केला. त्यांचेच शिष्य असलेले न्यायाधिश कोतवाल यांच्याकडून असा निर्वाळा करुन घेतला. त्यामुळे बौध्द धम्मदिक्षेवर संकट आले होते. तेव्हा आवळे बाबूंनी निकालाची सत्यप्रत काढून त्याचे हिन्दी मराठी भाषांतर केले. जनसभा घेवुन जनतेला त्याची माहिती दिली व सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी लोकांकडून वर्गणी जमा केली व सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश मा. गजेन्द्र गडकर यांनी १४ ऑक़्टोबर १९५६ या दिवशी धम्मदिक्षेचाच कार्यक्रम होता, ती राजकीय सभा नव्हती असा महत्वपूर्ण निर्णय दिला. त्यामुळे बुध्द धम्मावर आलेले संकट टळले. जनतेने आवळेबाबूंना धम्मरक्षक ही पदवी बहाल केली.
८) बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचना या पुस्तकात लहान राज्यांची मांडणी केली. आवळे बाबू यांनी लहान राज्याच्या चळवळीच्या माध्यमातून आंबेडकरवादी विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सक्रीयपणे सहभाग घेतला आणि या चळवळीचे नेतृत्व केले.
९) मध्यप्रदेश मधुन विदर्भ महाराष्ट्रात सामिल झाला त्यावेळी विदर्भातून विधान परिषदेवर सदस्य निवडायचा होता. विदर्भवादी आमदारांनी एकमताने आवळेबाबूंना आपला प्रतिनिधी निवडले व १३ ऑक़्टोबर १९५६ ला आवळे बाबू विधान परिषदेचे सदस्य घोषित झाले.
१०) महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांनी जेव्हा आवळेबाबू यांचेशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तेव्हा आवळेबाबू म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना तेव्हाच भेटेन जेव्हा ते माझ्या अटींची पुर्तता करतील त्या अटी अशा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेंब्ली हॉलच्या व्हरांड्यात आहे तो सन्मानाने मध्यभागी लावावा, दिक्षाभूमीची १४ एकर जमीन बौध्दांच्या ताब्यात द्यावी, सरकारने बाबांच्या स्मारकासाठी २५ लाखांचे अनुदान सरकारी तिजोरीतुन द्यावे.
११) भंडारा जिल्ह्यातील बीडी कामगारांची व्यथा आवळेबाबूंनी विधान परिषदेत मांडली.
१२) सन १९४० ला आवळेबाबूंनी समता सैनिक दलात शिपाई म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९५७ ला ते समता सैनिक दलाचे राष्ट्रिय अध्यक्ष झाले. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे ते प्रांतीय सचिव होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे १९५९ मध्ये राष्ट्रिय अध्यक्ष झाले.
१३) मध्यप्रांत व-हाडची नागपूर राजधानी असतांना तत्कालिन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यानी आपल्या मंत्रीमंडळात मंत्री पदाची ऑफर दिली तेव्हा आवळे बाबू म्हणाले, मी या कुडाच्या घरात सुखासमाधानाने राहतो. मी डो. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. मला मंत्री व्हायचे असेल तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील सरकार मंत्री होईल, तुमचा गुलामीचा बंगला नको.
१४) आवळे बाबू आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे अध्यक्ष होते. राजाभाऊ खोब्रागडेसोबत विचार विनिमय करुन त्याना आपल्या पक्षाचे अध्यक्ष केले व स्वत: उपाध्यक्ष झाले.

No comments:

Post a Comment